पेट्याच पेट्या
Labels: बोल गप्पा, शाळा, शैक्षणिक साहित्य
Labels: बोल गप्पा, शाळा, शैक्षणिक साहित्य
#बोलगप्पा_दैनंदिनी
#बोलगप्पा_दैनंदिनी
क्रमांक 5
चिमण्यांचा थवा चिमण्यांच्या अंगणी
मराठी शाळांमध्ये एखादा शिक्षक सुटीवर गेला की त्याचा वर्ग कुणाला तरी सांभाळावा लागतो. कधी एक तर कधी दोन तीन दिवसांचे पाहुणे विद्यार्थी वर्गात येतात. बैठक व्यवस्था, अध्यापनाची पद्धत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्ग नियंत्रण अवघड होऊन बसतं. असो.
दुसऱ्या वर्गातील पाहुण्यांना एक छोटा अभ्यास देऊन पहिलीला अक्षर गटांची ओळख देणे सुरू होते. काही जागरूक पालकांची मुले पूर्वप्राथमिक शिक्षण घेऊन आलेली असल्याने सुंदर लिहीत होती, अक्षरे ओळखत सुद्धा होती. काही विद्यार्थी मात्र कसलाही गंध नसल्याने शाळा पूर्वतयारी मध्ये अडकून होती. एक दोन लाडके विद्यार्थी तर हातात खडू सुद्धा नीट धरू शकत नव्हते.
छोट्या दोस्तांचा एकाग्र होण्याचा काळ फारच अल्प असतो. त्यामुळे विनोद, गप्पा, गोष्टी, कृतियुक्त बडबडगीते आणि गाणी यांची पेरणी सारखी करावी लागते. हे करतांना शिक्षक म्हणून आपण खूप दमून जातो.
नेमका पाऊस पडून गेलेला होता आणि गट्टू फरश्या थोड्या कोरड्या व्हायला लागल्या होत्या. वर्गाबाहेर का कुणास ठाऊक सर्वात जास्त उत्साह मुलांना असतो. अर्ध वर्तुळात बसवून कसलेही पुस्तक वैगेरे हाती न घेता मी हलक्या फुलक्या गप्पा मारायला लागलो.
वर बघा, काय दिसतं?
आभाळ, ढग….आकाश…. झाडं….. खंबा…. वायरी….
ज्याला जे महत्त्वाचं वाटत होतं ते उत्तर मुलं सांगत होती.
आभाळात काय दिसतं बघा बरं.
ढगं, काले काले…
ढगं पळतात का बघा बरं
हो सर, नाही सर, अय इकडं बघ न, कसे बींग पयतात ते…हो सर बिंगाट पयतात.
ढगात काय असतं?
पाऊस…पाणी….म्हातारी असते सर…ती दयते अन् मग गडगड आवाज होते….तो ढग आता पाणी आणाले चालला…. सर पाण्याची वाफ होते अन् ढगात जाते. हे उत्तर आश्चर्यचकित करणारे होते. आपण शिक्षक म्हणून त्यांना कच्चं मातीचं मडकं समजतो ते चूकच.
सरमिसळ उत्तरे येत होती. कुणालाच न खोडता, त्यांच्या त्यांच्या कलाने गप्पा पुढे पुढे जाऊ देत होतो. घरच्या भाषिक समृद्धीचा आणि आर्थिक समृद्धीचा थेट संबंध बघायला मिळत होता. पण विचार करताना मात्र सर्वच मुले आपल्या भाव विश्वातील उत्तरे देत होती.
तेवढ्यात गंमत झाली. मुलांच्या पाठीमागे पोषण आहाराच्या खोली पुढे तांदूळ, डाळ आणि खरगटे दाणे वेचायला चिमण्यांचा थवा येऊन बसलेला. माझं आणि मुलांचं एकचित्त होऊन गप्पात गुंग होणं, म्हणून की काय त्या मस्त शाळा भरवून दाण्यांचा आस्वाद घेत होत्या. त्यांना जराही कळू न देता, मी मुलांना बोटाने खुणावले. बसल्या जागी तोंड फिरवून सगळ्यांना चिमण्या दाखवल्या.
हळू आवाजात मोजून सांगा किती चिमण्या आहेत. एक दोन बहाद्दर मोजायला जवळ जाणारच, मी त्यांना हाताने खाली बसवले.
सर 7 चिमण्या, नाही चार चिमण्या….दोन उडाल्या बी…..आता अजून एक आली रे…तीन झाडावर गेल्या. ते दोघं मित्र असतीन रे.
सगळी चिमण्या मोजण्यात गर्क झाली. खोडावर किती बसल्या? किती उडाल्या अन् किती राहिल्या??
चिमण्याचं घर कुणी कुणी पाहिलं? कसं बनवतात ते.
चिमणा चिमणी…कावळ्याची गोष्ट…आमच्या घराच्या गच्चीवर हाय सर त्यायच घर. एकदा एक पिल्लू पडलं होतं. आम्ही त्याले पाणी पाजलं.
सर तिची मम्मी तीले दूध पाजत असन का? कावळा कुठं राहतो? कबुतराचा आवाज कसा? कोंबडी सुद्धा अंडं देते. पण तिले उडता नाई येत.
आम्ही इंद्रधनुष्य पाह्यलं होतं….त्यात लाल कलर असते. निळा बी असते. काळा असते का सर??
कबुतर हाय सर एक, एक टिटवी हाय….स्पैरो आहे सर…
भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास…अन् कुठलं कुठलं काय…माहित नाही. तब्बल दोन तास त्यांचं चित्र विचित्र भाव विश्व गप्पा मधून धबधब्यासारखं ओसंडत होतं.
पुस्तकाबाहेरची शाळा यानिमित्ताने मला शिकायला मिळाली. हा धडा अजून चांगला गिरवायला पाहिजे हे नक्की.
शब्दांकन - संदीप विष्णू राऊत (प्राथमिक शिक्षक)
raaut.sandip@gmail.com
( सर्व छायाचित्र वास्तविक आहेत.)
स्टेटस बिटस पुराण #सहजच #हलकं_फुलकं (पूर्ण वाचा आणि प्रतिक्रिया द्या)
Labels: मराठी, ललित, लेख, हलकं फुलकं
#बोलगप्पा_दैनंदिनी
क्रमांक ३
अग्गो बाई ढग्गो बाई !!
यावेळी शाळा उशिरा सुरू झाल्या आणि दुर्देवाने पाऊस ही उशिरा पडला. सकाळी अतिशय कडकडीत ऊन पडलेलं. मनात म्हटलं आपण आजच डीक्कीत रेनकोट ठेवलेला, पावसाचा जराही अंदाज वाटत नाहीये.
परिपाठ घेताना नव्याने रुजू झालेल्या पहिल्या वर्गाची छान उपस्थिती पाहून आनंद वाटला. अजुनही माहेरी आलेल्या त्या दोन आयांची मुलं दिसली नाही. दुपारी चक्कर मारावी लागणार. पालकांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला, पण अर्ध्या अधिक पालकांकडे स्मार्ट फोनच नाही. सगळंच कुठे मनासारखं व्हायला. असो.
वर्गात बालभारती भाग १ पुस्तकात पहिलाच पाठ कवितेचा. आणि चक्क माझ्या अतिशय आवडत्या जोडीची संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचीआवडती कविता. अग्गो बाई…!! म्हटलं चला सुरुवात यानेच करावी. मुलांना नाचायला, गाणी म्हणायला खूप आवडतं. मला कंबर वाकवून नाचायला खूप वर्ष झालेली. पण म्हटलं जसं जमेल तसं.
अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न् थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ॥धृ.॥ अग्गोबाई …
कंबरेत वाकून अग्गो बाई म्हणताना माझा जरा जाडसर आवाज ऐकून मुलं चक्क हसली मला. पण म्हटलं लाजायचं नाही. मग काय…धम्माल नुसती, मुलांना आवडायला लागली.
वारा वारा गरागरा सो सो सूम्
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम
वीजबाई अशी काही तोर्यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी ॥१॥ अग्गोबाई …
ढोल्या ढोल्या ढगात…म्हणताना कुठल्या तरी ढोल्या माणसाची नक्कल खूपच आवडली छोट्यांना. ते कडवं मग फेवरेट झालं…ढुम ढुम ढुम
करत अशी काही खिदळली की..वर्गात नुसता कल्ला झाला.
चमचम छडी हातावर मारताना कमरेचा ठुमका अन् जणूकाही त्यांच्यात मारकुटे पंतोजी शिरले.
खरी धमाल तेव्हा झाली, जेव्हा जोरदार पाऊस सुरू झाला. कुणाला कुणाचा आवाज येईना…. रप रप रप…. पत्राच्या खोल्यात अशावेळी घसा कोकलून काहीही उपयोग नसतो. मग काय, दप्तर बिप्तर गुंडाळून सगळे दाराशी जमा झालो. पावसाच्या काही सरी अंगावर झेलत, जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या आवाजाचा, फरशीवर फुटणाऱ्या फुग्यांच्या गमतीजमतीचा आनंद घेतला. अगदी काहीच वेळात मैदानावर साचलेलं पाणी, वाहणारे गढूळ ओहोळ बघण्याची मजा औरच.
सर लघवीला सोडा ना…अरे पाऊस किती आहे?
प्लीज सर जाऊ द्या ना…बरं भिजू नका, आणि पळत सुटू नका…माझं म्हणणं कुणी ऐकेल तर शपथ…
सगळ्या बहाध्दरांनी पाण्याच्या डबक्यात उड्या काय मारल्या, पत्राच्या पाण्यात एकमेकांना भिजवलं काय, अर्धवट ओले झालेले त्याचे खोडकर चेहरे पाहून मला काय समजायचं ते समजलं. चक्क मला गंडवून त्यांनी पावसाचा पूर्ण आनंद घेतला.
खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव ॥२॥ अग्गोबाई …
साबु-बिबु नको
थोडा चिखल लगाव…..
थोडा चिखल लगाव…..
आता कविता खऱ्या अर्थानं पूर्ण झाली.
लेखन - © संदीप विष्णू राऊत
प्राथमिक शिक्षक (माजी बालभारती राज्य अभ्यास गट सदस्य)
raaut.sandip@gmail.com
(वरील लेख शिक्षक म्हणून मुलांकडून शिकताना येणारे अनुभव यांचे लिखाण आहे.)
चित्रे इंटरनेट वरून साभार.