Thursday, July 27, 2023

पेट्याच पेट्या

#बोलगप्पा_दैनंदिनी 
क्रमांक 7
पेट्याच पेट्या 
दरवर्षी शाळेला काहीना काही साहित्य प्राप्त होत असतं. त्यात शैक्षणिक साहित्य साधने असतात तर कधी विविध प्रशिक्षणाच्या पुस्तिका असतात. नियमाप्रमाणे प्राप्त साहित्याच्या रेकॉर्ड वर घेऊन त्याची नोंद व्यवस्थित केल्या जाते. नवीन नवीन असेपर्यंत काही दिवस वापरले जाते आणि मग अडगळीत पडते.

आज शाळेतील सगळ्या पेट्या उघडायच्या. जुन्या नव्या सगळ्यांना उघडून त्यातील साहित्याची नीट व्यवस्था लावायची.

मी प्रस्ताव दिला, मुख्याध्यापकांनी लगेच मान्य केला. साहित्य कोणकोणते आहे याची वर्गवारी आणि व्यवस्थित यादी करा सर. मुख्याध्यापकांनी सूचना दिली. मग काय सर्व सहकारी मंडळींना घेऊन बाहेर पटांगणात मोठी सतरंजी टाकली, सोबत दोन मुले मदतीला घेतली. मांडी घालून सगळ्या पेट्या बाहेर काढल्या.

खिडकीतून पहिलीची मुलं डोकावून बघत होतीच. जादूची पेटी काढून गुरुजी काहीतरी मजेदार बघत आहेत. आपल्याला मात्र दाखवत नाहीत. असं काहीसं वाटत असावं. काहीतरी बहाण्याने मुलं हळूहळू भोवताली जमा झालीच. 

एक एक साहित्य काढून त्याची नोंद घेतली. त्यावरील माहिती पुस्तिकेत वाचून सगळ्यांनी समजून घेतली. जिथे वाचून कळले नाही तिथे qr कोड स्कॅन करुन व्हिडिओ बघून समजून घेतले. खरंच किती दर्जेदार आणि उपयुक्त साहित्य पेट्यांमध्ये बंदिस्त होऊन राहतं.
एक बाब प्रकर्षाने जाणवली, साहित्य जरी विशिष्ट घटकांसाठी बनवलेले असले तरीही त्याचा वापर असंख्य प्रकाराने करता येतो. बघता बघता आम्ही सर्वजण याचं काय काय करता येईल यावर गुंग होऊन चर्चा करत होतो.

साहित्य सुटे सुटे करून वाटल्याने त्याची एकसंघता निघून जाते. नंतर त्याची संगती लागत नाही. म्हणून आम्ही लायब्ररी सिस्टीम ने एकाकडे साहित्याचा चार्ज देऊन गरजे नुसार साहित्य नोंदवून वापरायचं ठरवलं.
यातून सर्व वर्गांना सर्व साहित्य वापरायला मिळते आणि साहित्य organise करून राहतं.

हे त्रिमितीय आकार दुसऱ्या वर्गाच्या कामाचे आहे सर.

नाही नाही हे घनफळ आणि पृष्ठ फळाचे साहित्य आहे, आमच्या वर्गाला उपयोगाचे आहे.

नाही नाही सर याचा उपयोग चित्रकलेच्या तासाला सुद्धा करता येणार आहे.

असा संवाद सारखा कानावर येत होता. गंमत सांगू का कोणतंही शैक्षणिक साहित्य कुणा वर्गाचं नसतंच. कारण जेवढी अधिक सृजनशीलता लावाल तितक्या पद्धतीने साहित्य वापरल्या जाऊ शकतं.
उदाहरण म्हणून बघा. हे त्रिमितीय आकार ओळख म्हणून छोट्या वर्गाला उपयोगाचे आहे, त्यात पाणी भरलं तर घनफळाची सूत्रे उलगडायला वरच्या वर्गाला उपयोगाचे आहे. घनता, पृष्ठफळ याशिवाय, कार्यानुभव, कलेच्या तासाला रेखाटन करायला त्याचा उपयोग करता येईल. 

शेवटी काय ही नमुना म्हणून दिलेली साहित्य आहेत, आपल्या आजूबाजूला बघितलं तर साहित्यच साहित्य दडलेले आहे. शिक्षक सृजनशील असेल तर वर्तमानपत्राची ही रद्दी सुद्धा साहित्याची खाणच आहे. 

जुन्या नव्या सहित्यांना पुन्हा व्यवस्थित लावत शिक्षणाच्या वाटा सोप्या करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. 

(आपण काय काय करता? 
शैक्षणिक साहित्य वापरण्याचा खरंच उपयोग होतो का? यातील मुख्य अडचणी कोणत्या येतात? आवर्जून प्रतिसाद द्या.)

लेखन - संदीप विष्णू राऊत (प्राथमिक शिक्षक)
raaut.sandip@gmail.com
(नव्या पेटीतील tangram च्या साहाय्याने मुलांनी लावलेले नवे शोध फोटोत नोंदवले आहेत.)

Labels: , ,

Saturday, July 22, 2023

बोलगप्पा_दैनंदिनी 6 धुळपाटी आणि काडी चित्र

#बोलगप्पा_दैनंदिनी 
क्रमांक 6
धुळपाटी आणि काडी चित्र

छोट्या दोस्तांना खेळ, मस्ती आणि शारीरिक हालचाली ह्या सतत हव्या असतात. मारून मुटकून बसवलं, तोंडावर बोट अन् हाताची घडी केली तर काहीवेळ आपल्याला शांतता मिळाली असं वाटणं हा गोड गैरसमज आहे. खरं तर ते अमानवी सुद्धा आहे. ज्यांचे चयापचय एवढे क्रियाशील आहे अशा छोट्या मुलांना तासनतास एका बेंचवर बसवणं जरा अन्यायकारकच.

त्यासाठी मी डेस्क बेंच भिंतीला टेकून अगदी मोजके c आकारात लावून ठेवले. मध्ये एक मोठी पट्टी कायम स्वरुपी ठेवली. जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा मुलं तिथे झोपून, कशी रेलून, कधी मांडी घालून मस्त लिहितात. घोळका करून गप्पा करतात. दोघांचे गट, तीन चार जणांच्या गटात छोट्या छोट्या कृती करत शिकणं मजेदार होतं.

वेगवेगळ्या रंगांची रांगोळी आणि बाजारात स्वस्त मिळणारे पाटीच्या पेक्षा जरा मोठ्या आकाराचे प्लास्टिक ट्रे वापरून धुळपाटी बनवली. त्यात दोन इंच जाडीची रांगोळी पसरली. दोघांत एक एवढ्या प्रमाणात धूळ पाट्या गिरवायला दिल्या. रांगोळी सांडणार नाही, कपडे मळणार नाही यासाठी जमिनीवर ठेवायला आणि उलट्या पेन्सिलने गिरवायला सांगितले. पहिल्या दिवशी हवं ते गिरवायला संधी दिली. 

जरा सांडा-सांडी, भांडा भांडी झालीच. मला आवडता रंग हवा म्हणून खेचा खेची झालीच. पण नंतर चक्क तासभर मुलं तल्लीन होऊन मनसोक्त काहीबाही गिरवत होते. कुणी ABCD तर कुणी अंक सुद्धा नकळत गिरवले. माझं बघा म्हणताना पाटी सारखी उचलून धरली, ती सांडू नये यासाठी बरीच कसरत करावी लागली. शेवटी त्यांना सवय झाली. पीठ, माती, बारीक वाळू सुद्धा वापरायला हरकत नाही.

आईस्क्रीम काड्या हा स्वस्त आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध होणारे साधन. मोजायला म्हणून सगळ्यांना न मोजता हाती येतील तेवढ्या दिल्या. काहींनी मोजलं काहींना कसं मोजावं तेच सुचेना. 
एक दोन तीन पाच दहा बारा…असं क्रम चुकवत कुणी मोजत होतं. कुणी क्रम बरोबर पण बोटं घाईघाईने पुढे घेत मोजत होतं. 
एकाचं या गोष्टीत लक्षच नव्हतं. त्याने काड्या जोडून कसलातरी आकार बनवायला घेतलेला.

मला क्लिक झालं, काड्या जोडून काहीतरी आकार बनवण्यात मुलांना जास्त आनंद. मी त्यांना म्हटलं तुम्हाला आवडेल तो आकार बनवा. कुणी घर, कुणी पाटी, कुणी सूर्य, कुणी रस्ता, रेल्वे रूळ, गाडी..अबब….इतके सारे आकार. काहींना काड्या कमी पडायला लागल्या, मी म्हटलं दोघांनी एकत्र करून बनवा. मग तर कल्पनेला भरारी मिळाली.

तरीही रूद्र चं समाधान होत नव्हतं. 

"सर मले लय काड्या पाहिजे." 

मी मग ठरवलं, ज्याला जेवढ्या काड्या लागतील तेवढ्या द्यायच्या. सगळ्यांना थांबवून मी अख्खा काड्यांच्या ट्रे त्याच्या हवाली केला.
पुढचे पंधरा मिनिट रुद्रने मोठी रचना बनवली.

"सर हा आपल्या शाळेजवळ चा मोठ्ठा रस्ता आहे. "

कुणी बिल्डिंग, कुणी फुलांची डिझाईन, कुणी माणूस, कुणी अगम्य अगम्य असं काहीबाही बनवलं. त्यांच्या नजरेनं अर्थपूर्ण असल्याने मी संयम बाळगून त्यांना बोलू दिलं. नवनिर्मिती साठी मुलांना काहीही साधन चालतं.

आपण शैक्षणिक साहित्य म्हणून जो उद्देश ठेवतो, तोच आणि तसाच त्याचा उपयोग होईल असं नसतं. एकाच साधनाचा गरजेनुरूप लवचिक उपयोग करून ठरवलेला घटक, आणि न ठरवलेला घटकही घ्यावा लागतो. 

संदीप विष्णू राऊत ( प्राथमिक शिक्षक)
raaut.sandip@gmail.com 
( आपल्या वर्गातील अशाच काही मजेदार कृती असतील तर आवर्जून शेअर करा.)

Labels: , , ,

Tuesday, July 18, 2023

चिमण्यांचा थवा चिमण्यांच्या अंगणी

#बोलगप्पा_दैनंदिनी
क्रमांक 5
चिमण्यांचा थवा चिमण्यांच्या अंगणी

मराठी शाळांमध्ये एखादा शिक्षक सुटीवर गेला की त्याचा वर्ग कुणाला तरी सांभाळावा लागतो. कधी एक तर कधी दोन तीन दिवसांचे पाहुणे विद्यार्थी वर्गात येतात. बैठक व्यवस्था, अध्यापनाची पद्धत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्ग नियंत्रण अवघड होऊन बसतं. असो.

दुसऱ्या वर्गातील पाहुण्यांना एक छोटा अभ्यास देऊन पहिलीला अक्षर गटांची ओळख देणे सुरू होते. काही जागरूक पालकांची मुले पूर्वप्राथमिक शिक्षण घेऊन आलेली असल्याने सुंदर लिहीत होती, अक्षरे ओळखत सुद्धा होती. काही विद्यार्थी मात्र कसलाही गंध नसल्याने शाळा पूर्वतयारी मध्ये अडकून होती. एक दोन लाडके विद्यार्थी तर हातात खडू सुद्धा नीट धरू शकत नव्हते.

छोट्या दोस्तांचा एकाग्र होण्याचा काळ फारच अल्प असतो. त्यामुळे विनोद, गप्पा, गोष्टी, कृतियुक्त बडबडगीते आणि गाणी यांची पेरणी सारखी करावी लागते. हे करतांना शिक्षक म्हणून आपण खूप दमून जातो.

नेमका पाऊस पडून गेलेला होता आणि गट्टू फरश्या थोड्या कोरड्या व्हायला लागल्या होत्या. वर्गाबाहेर का कुणास ठाऊक सर्वात जास्त उत्साह मुलांना असतो. अर्ध वर्तुळात बसवून कसलेही पुस्तक वैगेरे हाती न घेता मी हलक्या फुलक्या गप्पा मारायला लागलो.

वर बघा, काय दिसतं?

आभाळ, ढग….आकाश…. झाडं….. खंबा…. वायरी….

ज्याला जे महत्त्वाचं वाटत होतं ते उत्तर मुलं सांगत होती.

आभाळात काय दिसतं बघा बरं.

ढगं, काले काले…

ढगं पळतात का बघा बरं

हो सर, नाही सर, अय इकडं बघ न, कसे बींग पयतात ते…हो सर बिंगाट पयतात.

ढगात काय असतं?

पाऊस…पाणी….म्हातारी असते सर…ती दयते अन् मग गडगड आवाज होते….तो ढग आता पाणी आणाले चालला…. सर पाण्याची वाफ होते अन् ढगात जाते. हे उत्तर आश्चर्यचकित करणारे होते. आपण शिक्षक म्हणून त्यांना कच्चं मातीचं मडकं समजतो ते चूकच.

सरमिसळ उत्तरे येत होती. कुणालाच न खोडता, त्यांच्या त्यांच्या कलाने गप्पा पुढे पुढे जाऊ देत होतो. घरच्या भाषिक समृद्धीचा आणि आर्थिक समृद्धीचा थेट संबंध बघायला मिळत होता. पण विचार करताना मात्र सर्वच मुले आपल्या भाव विश्वातील उत्तरे देत होती.

तेवढ्यात गंमत झाली. मुलांच्या पाठीमागे पोषण आहाराच्या खोली पुढे तांदूळ, डाळ आणि खरगटे दाणे वेचायला चिमण्यांचा थवा येऊन बसलेला. माझं आणि मुलांचं एकचित्त होऊन गप्पात गुंग होणं, म्हणून की काय त्या मस्त शाळा भरवून दाण्यांचा आस्वाद घेत होत्या. त्यांना जराही कळू न देता, मी मुलांना बोटाने खुणावले. बसल्या जागी तोंड फिरवून सगळ्यांना चिमण्या दाखवल्या.

हळू आवाजात मोजून सांगा किती चिमण्या आहेत. एक दोन बहाद्दर मोजायला जवळ जाणारच, मी त्यांना हाताने खाली बसवले.

सर 7 चिमण्या, नाही चार चिमण्या….दोन उडाल्या बी…..आता अजून एक आली रे…तीन झाडावर गेल्या. ते दोघं मित्र असतीन रे.

सगळी चिमण्या मोजण्यात गर्क झाली. खोडावर किती बसल्या? किती उडाल्या अन् किती राहिल्या??

चिमण्याचं घर कुणी कुणी पाहिलं? कसं बनवतात ते.

चिमणा चिमणी…कावळ्याची गोष्ट…आमच्या घराच्या गच्चीवर हाय सर त्यायच घर. एकदा एक पिल्लू पडलं होतं. आम्ही त्याले पाणी पाजलं.

सर तिची मम्मी तीले दूध पाजत असन का? कावळा कुठं राहतो? कबुतराचा आवाज कसा? कोंबडी सुद्धा अंडं देते. पण तिले उडता नाई येत.

आम्ही इंद्रधनुष्य पाह्यलं होतं….त्यात लाल कलर असते. निळा बी असते. काळा असते का सर??

कबुतर हाय सर एक, एक टिटवी हाय….स्पैरो आहे सर…

भाषा, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास…अन् कुठलं कुठलं काय…माहित नाही. तब्बल दोन तास त्यांचं चित्र विचित्र भाव विश्व गप्पा मधून धबधब्यासारखं ओसंडत होतं.

पुस्तकाबाहेरची शाळा यानिमित्ताने मला शिकायला मिळाली. हा धडा अजून चांगला गिरवायला पाहिजे हे नक्की.

शब्दांकन - संदीप विष्णू राऊत (प्राथमिक शिक्षक)
raaut.sandip@gmail.com
( सर्व छायाचित्र वास्तविक आहेत.)


Labels: , ,

Thursday, July 13, 2023

आशिषला लागली गोडी

#बोलगप्पा_दैनंदिनी 
क्रमांक ४

आशिषला लागली गोडी

"अहो आजी सोडा की त्याला, एकतर नाव टाकल्यापासून आज पहिल्यांदा शाळेत येतोय तो. त्याला नियमित शाळेत पाठवा की."
मी म्हटले.

"मामाला वेळ नसतो, आईला लाज वाटते, अन् आईचं ऐकतही नाही तो. म्हणून मी घेऊन आली. त्याच्या बापाबद्दल तुम्हाला तर माहित आहेच गूर्जी." आजी म्हणाली. होय तोच हा आशिष ज्याच्या आईने बापाच्या ऐवजी स्वतःचे नाव लावलेले.

आजीच्या डोळ्यात आणि आशिषच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं होतं. शाळेत दाखल करताना पहिल्या दिवशी सगळेच पालक का हळवे होतात माहिती नाही. मी एक पालक म्हणून सुद्धा हा अनुभव घेतला आहेच. कदाचित आईच्या वडिलांच्या अतिशय मायाळू पदरातून नवख्या पदरात देताना सासरी जाणाऱ्या मुलीसारखा फिल येत असावा. 

"ऐकणार नाही गुर्जी तो. काहीवेळ थांबते मी." 

तो ही आजीच्या पदराला घट्ट धरून, चोरट्या नजरेने मला जोखत होता. मी म्हटलं, "बैस बाळा. मस्त रंगीत खडू देतो तुला. की एखादं छान चॉकलेट देऊ."
कसल्याच आमिषाला बळी न पडता अजूनच आजीला घट्ट बिलगून तो आणि आजी दोघेही वर्गात बसले. दिवसभर आजीला वर्गात बसावेच लागले.

दुसऱ्या दिवशी सकाळी परत आजी आणि रडका आशिष असेच चित्र बघायला मिळाले. आजी साथ सोडत नव्हती, आणि आशिष रुजत नव्हता. रागावून सुद्धा आजीला सोडण्याची त्याची तयारी नव्हती.

नव्याने आलेली शैक्षणिक साहित्याची पेटी काढून, रंगीबेरंगी चित्रं बघायला दिली. बहुतांशी मुलांकडे पाटीच असल्याने मी मुद्दाम पाटी शिकवायला घेतली. संख्यांची रूपं समजून घेताना मुद्दाम मैदानातून खडे आणायला सांगितले, मग झाडांची पानं आणायला सांगितली. गटात मोजायला सुरुवात झाली. एकास एक संगती लावत संख्यांची समज विकसित करण्याचा प्रयत्न मी करत होतो. अंकांची गाणी म्हणायला सर्वांना मजा वाटत होती.

सगळी मुलं पुढं पुढं येऊन गमतीदार कृती करत होते. एकमेकांची उत्तरं आधी देण्याची चढाओढ लागली होती जणू. चोरट्या नजरेने मीही आशिषला बघत होतो. आणि तो पुढे सरकत सरकत गटात नकळत सामील होत होता. आशिषने चक्क आजीचा पदर सोडला होता. जागा सोडून मोठ्या डोळ्यांनी सगळं बघत होता. अजूनही मुद्दाम मी त्याला काहीही करायला सांगितलं नाही. मग दाखवलेल्या बोटाएवढ्या टाळ्या, उड्या मारायला सुरुवात झाली. गाणी म्हणता म्हणता….आशिष नाचायला लागला.

आजी वर्गाबाहेर गेल्याची जराही भणक त्याला लागली नाही. साधं दप्तर ही नसलेला आशिष जरा मोकळा झाला. हसून बोलायला लागला. वाटतं तेवढं गुरुजी हे प्रकरण गंभीर नाही हे त्याला पटलं असावं.  दुपारी भूक लागल्यावर जरा आजीची आठवण झाली. पण एकदाही रडला नाही. 

तिसऱ्या दिवशी आजीला विश्वास बसेना. आशिष वर्गात रमताना बघून, एका आईचा पदर सुटला तरी दुसऱ्या आईचा पदर हातात देताना, आजीच्या डोळ्यात निराळीच चमक दिसायला लागली. यावेळी आजीच्या डोळ्यात आलेले अश्रू नक्कीच वेगळे होते.

लेखन - संदीप विष्णू राऊत
raaut.sandip@gmail.com
( चित्र प्रतीकात्मक आहे, साभार इंटरनेट ) हे सदर आपल्याला आवडत आहे का? आपले अभिप्राय आवर्जून नोंदवा.

Labels: , ,

Saturday, July 8, 2023

स्टेटस बिटस पुराण

स्टेटस बिटस पुराण #सहजच #हलकं_फुलकं (पूर्ण वाचा आणि प्रतिक्रिया द्या) 

"माझं आजचं स्टेटस बघितलं का?" मित्राचा मेसेज आलेला. ही म्हणजे जरा हद्दच झाली. 

"काय यार मी चांगला मित्र समजत होतो तुला, आजकाल लक्ष नाहीये तुझं माझ्याकडे. साधं स्टेटस तरी बघत जा की."

"त्या बायकांचे स्टेटस बघायला बरा वेळ असतो तुम्हाला, बायकोचे स्टेटस कधीतरी बघत जा."

"काय झालं? बरा आहेस ना? नाही म्हणजे बरेच दिवस झाले एक साधं स्टेटस बिटस दिसलं नाही अशात..."

"माझ्या स्टेटस ला कमीतकमी ५०० व्ह्यू असतातच." कधी कधी तर भावा एक हजार क्रॉस जातात."

असं खूपवेळा ऐकायला मिळत असेलच आपल्याला. सकाळी उठल्यावर आणि झोपण्याच्या आधी....ब्रश वैगेरे केलं पाहिजे...बरोबर ना??
साफ चुकला अंदाज तुमचा....अहो स्टेटस बघितलं पाहिजे स्टेटस... प्रभाते कर दर्शनम....हाहाहा. 

स्टेटस चा शब्दशः अर्थ स्थिती, प्रतिष्ठा असा होतो. आजकाल आपली मनस्थिती, आर्थिक स्थिती आणि प्रतिष्ठा ( खरी खोटी) दाखवायला याचा उपयोग होतो. सुंदर विचार, quote आणि मधुर गाणी, सुंदर फोटो, कलाकृती आणि संदेश सुद्धा बघायला मिळतात. पण त्यातील परस्पर विरोध, द्वंद्व, हास्यास्पद अनुभव यांचा हा हलका फुलका धांडोळा.

हा प्रकार व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, फेसबुक ने एकदम पॉप्युलर केला. सर्वात जास्त engage व्हॉट्सॲप स्टेटस पाहायला मिळतो. कारण सर्वात सुटसुटीत आणि सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या सोशल ॲप मध्ये सध्यातरी व्हॉट्सॲप चा नंबर पहिला असावा. 

सोशल मीडिया पासून पूर्णपणे दूर राहणारे, किंवा अतिशय संयमाने वापरणाऱ्या मोजक्या सन्माननीय अपवाद असणाऱ्या महाभागांना साष्टांग दंडवत. खरंच, मला अशा व्यक्तींचा प्रचंड आदर वाटतो. ह्या व्यक्ती मला ऋषितुल्य वाटतात. जगाच्या एवढ्या प्रचंड आकर्षक मोह मायेपासून यांनी मुक्ती मिळवली आहे. खऱ्या अर्थानं ह्या व्यक्ती जीवनाचा आनंद घेत आहेत. मी त्यात मोडत नाही हे ओघाने आलंच. आपण सोशल मीडिया वरती पडीक असतो असेही नाही, पण त्यापासून दूर राहता येत नाही. त्याच्या सकारात्मक बाजू भुरळ पाडतात. असो.

आधीचा स्टेटस संपला, आणि स्टेटस ची चौकट रिकामी राहिली अस पाप कधीही करू नये. शक्यतो 24 तास संपण्याआधी नवे स्टेटस ठेवलेच पाहिजे असा अलिखित नियमच आहे. त्यातही वाढदिवस वैगेरे असेल तर जेवढ्या लोकांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या त्यांचे स्क्रीन शॉट काढून लगोलग ते स्टेटस ला ठेवता आले पाहिजे. मला शुभेच्छा दिल्या यापेक्षा कुणी कुणी दिल्या, आणि कुणी दिल्याचं नाही हे समजले पाहिजे. शक्यतो फेसबुक किंवा व्हॉट्सॲप वर डी पी बदलण्याचा हा सर्वात उत्तम मुहूर्त असतो. यातून कुणी सुटलाच तर त्याला माझा वाढदिवस आहे हे सुप्तपणे कळवण्याचा हा छुपा प्रकार आहे. 

स्टेटस किती ठेवावेत हा ज्याच्या त्याच्या क्षमतेचा प्रश्न आहे, वाचकाच्या सहनशीलतेचा नव्हे. घटत्या सिद्धांताचा इथे प्रत्यय येतो हा भाग वेगळा. शक्यतो फोटो स्टेटस बघण्याचा कल अत्याधिक आहे, व्हिडिओ बिडियो बघण्यात वाचकांना फारसा रस नसतो. त्यातही पुरुष मंडळी असतील तर सुंदर फोटो असणाऱ्या सेलिब्रिटी मंडळीचे स्टेटस बघण्यात जास्त रस असतो (इथेही अपवाद महाभाग यांना नम्रपणे वगळून). स्टेटस ठेवून झाल्यावर मिनिट भरात किमान दहा तरी व्ह्यू आले तर बरं, नाहीतर अस्वस्थ व्हायला होतं काही जणांना. जेवण्याची वेळ होईपर्यंत कमीत कमी १०० -२०० व्ह्यू मिळाले तर जेवण छान पैकी जातं. 

फेसबुक वर तर लाईक का केले नाही, केले तर शुभेच्छा का दिल्या नाही, यावरून वाद घालणारे मित्र मैत्रिणी बघायला मिळतात. घट्ट मैत्री असलेले मित्र, मैत्रिणी आणि कुटुंब सदस्य यांच्या समूहावर तर वाढदिवस, एखादे प्रमाणपत्र, प्रमोशन किंवा एखादा पुरस्कार मिळाल्यावर कुणीच प्रतिक्रिया दिली नाही किंवा खूपच उशिरा दिली की या जगातून निघून जाण्याची भावना उचंबळून येते. ( ही भावना लगेच लाईक्स आणि कमेंट मिळाल्यावर निघून जाते हा भाग वेगळा...) 

स्टेटस कोणता टाकावा हा पहिला प्रश्न असतो, त्यानंतर आपला टार्गेट area कोणता आहे, यानुसार त्यांनी बघितला का हे बघावं लागतं. ज्याने बघावा त्याने बघितला की नाही हेही बघावं लागतं. ज्यांनी बघावं त्यांनी का बघितला नसेल हेही बघावं लागतं. काही मिनिटांनी, तासांनी किंवा हाती मोबाईल लागेल तेव्हा तेव्हा एकूण किती व्ह्यू झाले हे अत्यंत काटेकोरपणे बघणे हे शास्त्र असतं. हे बघता बघता तासभर वेळ कुठे गेला हे बघायला गेलं की मनस्ताप वैगेरे होतो, पण त्याला इलाज नाही.

स्टेटस बघणाऱ्या लोकांची वेगवेगळी कॅटेगरी असते. सरसकट जेवढे कॉन्टॅक्ट असतील त्यांचे स्टेटस भराभर बघणारे पण कुणालाही प्रतिक्रिया न देणारे यात मोडतात. कारण त्यांनी मुळात ते नीट वाचलेलं नसल्याने प्रतिक्रिया उमटणे अशक्यच असतं. दुसरा प्रकार निवडक लोकांचे स्टेटस ठरवून बघणारे. हे खूप चतुर लोक असतात. वेळेचे व्यवस्थापन काटेकोर करत असल्याने हे चुझी असतात. स्वतःचे स्टेटस कुणी बघावं यासाठी सेटिंग करून ठेवण्याची काळजी यांनी घेतलेली असते. 

तिसरा प्रकार हा अघळपघळ स्टेटस बघणारे लोक, यांचे काही नियम ठरलेले नसतात. फावल्या वेळात जमेल तसं स्टेटस बघणे, आवडले तर उस्फुर्त प्रतिसाद देणारे हे मनाने मोकळे ढाकळे लोक असावेत. (यावर चांगला शो होऊ शकेल, स्टेटस बघणाऱ्या लोकांचे व्यक्तिमत्त्व) 
चौथा प्रकार म्हणजे ज्याचे स्टेटस आवडले त्यांचे मागून घेणारे, जमल्यास कॉपी पेस्ट करणारे लोक. स्वतः वेगळे स्टेटस ठेवण्यापेक्षा इतरांनी ठेवलेले छान स्टेटस ते ठेवतात. यासाठी लागणार धैर्य आणि मनाचा मोठेपणा असल्यामुळे असेल कदाचित, यानिमित्त का होईना पण ते खुली दाद देतात. किंवा स्टेटस शोधत बसण्याचा त्रास घेण्याची त्यांची इच्छा नसेल. 

स्टेटस मधील सुविचार बघून किंवा मोटिवेशन बघून किती लोक सुधारतात माहिती नाही. स्टेटस मुळे किती लोक प्रभावित होतात माहिती नाही. पण माणूस हा सामाजिक प्राणी आहे. कुजबुज करणे, गप्पा मारणे, एकमेकांच्या सहवासात राहणे ही माणसाची मानसिक गरज आहे. व्यक्त होणं, स्तुती मिळणं आणि सामाजिक स्थान मिळणं ही मानसिक गरज असतेच. 

स्टेटस ठेवा अगर न ठेवा पण चेहरा नसलेल्या ह्या गर्दीत एकमेकांची विचारपूस केली पाहिजे. प्रत्यक्ष भेट, बोलणे चालणे यासारखे सुंदर स्टेटस खरंच कोणतेच नसते. खोटं वाटत असेल तर आताच ठेवलेलं माझं स्टेटस बघितलं का ??

© लेखन - संदीप विष्णू राऊत
raaut.sandip@gmail.com

Labels: , , ,

Wednesday, July 5, 2023

अग्गो बाई ढग्गो बाई !! बोलगप्पा दैनंदिनी

#बोलगप्पा_दैनंदिनी
क्रमांक ३

अग्गो बाई ढग्गो बाई !!

यावेळी शाळा उशिरा सुरू झाल्या आणि दुर्देवाने पाऊस ही उशिरा पडला. सकाळी अतिशय कडकडीत ऊन पडलेलं. मनात म्हटलं आपण आजच डीक्कीत रेनकोट ठेवलेला, पावसाचा जराही अंदाज वाटत नाहीये.

परिपाठ घेताना नव्याने रुजू झालेल्या पहिल्या वर्गाची छान उपस्थिती पाहून आनंद वाटला. अजुनही माहेरी आलेल्या त्या दोन आयांची मुलं दिसली नाही. दुपारी चक्कर मारावी लागणार. पालकांचा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला, पण अर्ध्या अधिक पालकांकडे स्मार्ट फोनच नाही. सगळंच कुठे मनासारखं व्हायला. असो.

वर्गात बालभारती भाग १ पुस्तकात पहिलाच पाठ कवितेचा. आणि चक्क माझ्या अतिशय आवडत्या जोडीची संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचीआवडती कविता. अग्गो बाई…!! म्हटलं चला सुरुवात यानेच करावी. मुलांना नाचायला, गाणी म्हणायला खूप आवडतं. मला कंबर वाकवून नाचायला खूप वर्ष झालेली. पण म्हटलं जसं जमेल तसं.

अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ
थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ॥धृ.॥ अग्गोबाई …

कंबरेत वाकून अग्गो बाई म्हणताना माझा जरा जाडसर आवाज ऐकून मुलं चक्क हसली मला. पण म्हटलं लाजायचं नाही. मग काय…धम्माल नुसती, मुलांना आवडायला लागली.

वारा वारा गरागरा सो सो सूम्‌
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम
वीजबाई अशी काही तोर्‍यामधे खडी
आकाशाच्या पाठीवर चमचम छडी ॥१॥ अग्गोबाई …

ढोल्या ढोल्या ढगात…म्हणताना कुठल्या तरी ढोल्या माणसाची नक्कल खूपच आवडली छोट्यांना. ते कडवं मग फेवरेट झालं…ढुम ढुम ढुम
करत अशी काही खिदळली की..वर्गात नुसता कल्ला झाला.
चमचम छडी हातावर मारताना कमरेचा ठुमका अन् जणूकाही त्यांच्यात मारकुटे पंतोजी शिरले.

खरी धमाल तेव्हा झाली, जेव्हा जोरदार पाऊस सुरू झाला. कुणाला कुणाचा आवाज येईना…. रप रप रप…. पत्राच्या खोल्यात अशावेळी घसा कोकलून काहीही उपयोग नसतो. मग काय, दप्तर बिप्तर गुंडाळून सगळे दाराशी जमा झालो. पावसाच्या काही सरी अंगावर झेलत, जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या आवाजाचा, फरशीवर फुटणाऱ्या फुग्यांच्या गमतीजमतीचा आनंद घेतला. अगदी काहीच वेळात मैदानावर साचलेलं पाणी, वाहणारे गढूळ ओहोळ बघण्याची मजा औरच.

सर लघवीला सोडा ना…अरे पाऊस किती आहे?
प्लीज सर जाऊ द्या ना…बरं भिजू नका, आणि पळत सुटू नका…माझं म्हणणं कुणी ऐकेल तर शपथ…
सगळ्या बहाध्दरांनी पाण्याच्या डबक्यात उड्या काय मारल्या, पत्राच्या पाण्यात एकमेकांना भिजवलं काय, अर्धवट ओले झालेले त्याचे खोडकर चेहरे पाहून मला काय समजायचं ते समजलं. चक्क मला गंडवून त्यांनी पावसाचा पूर्ण आनंद घेतला.

खोलखोल जमिनीचे उघडून दार
बुडबुड बेडकाची बडबड फार
डुंबायला डबक्याचा करूया तलाव
साबु-बिबु नको थोडा चिखल लगाव ॥२॥ अग्गोबाई …

साबु-बिबु नको
थोडा चिखल लगाव…..
थोडा चिखल लगाव…..

आता कविता खऱ्या अर्थानं पूर्ण झाली.

लेखन - © संदीप विष्णू राऊत
प्राथमिक शिक्षक (माजी बालभारती राज्य अभ्यास गट सदस्य)
raaut.sandip@gmail.com
(वरील लेख शिक्षक म्हणून मुलांकडून शिकताना येणारे अनुभव यांचे लिखाण आहे.)
चित्रे इंटरनेट वरून साभार.


Labels: , , , ,

Monday, July 3, 2023

बोलगप्पा_दैनंदिनी लेख 2

#बोलगप्पा_दैनंदिनी
क्रमांक २ 
"आईचंच नाव लिवा, बापाचं नकू"

७ मुलांचे प्रवेश सुटीच्या आधीच झालेले होते. सोबतच्या सरांसोबत राहिलेल्या प्रवेशासाठी निघालो. मुख्य शहरापासून जवळच असल्याने खाजगी शाळांच्या बसेस, ऑटो सर्रास गावात येतात. कॉन्व्हेन्ट शाळांची, इंग्रजी शाळांची क्रेझ आणि इंग्रजी मधून शिक्षण म्हणजेच गुणवत्तेची हमी अशी पक्की धारणा असल्याने नर्सरी पासूनच मुलांना कॉन्व्हेन्ट मध्ये बऱ्याच सुखवस्तू पालकांनी घातलेले होते. नाही म्हणायला शिष्यवृत्ती आणि NMMS परीक्षेत गावातल्या जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुलींची नावे गावाच्या मुख्य प्रवेशाशी फलकावर दिमाखात झळकत होती. त्याचा फायदा मिळेल अशी आशा वाटत होती. 

गावाच्या एका टोकाकडे राहणारी वस्ती. प्रवेश पात्र मुलांच्या यादीत एक नाव काही केल्याने मिळेना. खूप जणांना विचारून झालं. नाव ही वेगळ्या धाटणीचं. सहज बोलता बोलता मी म्हटलं अशी नाव राजस्थानातील असतात. झाडाखाली निवांत बसलेल्या थोराड मुलांच्या टोळक्यानं ते ऐकलं. म्हणाले एक कुटुंब आहे राजस्थानी, तेच असावं. पत्ता अवघड वाटल्यानं एका मुलाला सोबत घेऊन तिथे पोहचलो. 

फारतर २३-२४ वर्षाची पोरसवदा आईच्या आजूबाजूला दोन छोटी मुलं घुटमळत होती. इथे प्रवेशाची मारामार आणि इकडे या मुलांना आणि त्यांच्या आईला आपली मुलं शाळेत दाखल करण्याजोगी झाली याचा पत्ता सुद्धा नाही. अंगणवाडी ताईंनी खरंच अतिशय अचूक माहिती नोंदवलेली होती. एक डोळा अधू असलेली ती मुलगी मात्र चक्क मराठीतून संवाद करत होती. नंतर कळलं की ती इथलीच, हे तिचं माहेर. राजस्थानी पतीसह तिचं बिनसलं. आई वडिलांनी दुसरं लग्न करून दिलेलं. दुसऱ्या पतीने मारहाण करून दारू ढोसून तिचे हाल केलेले. रागाने माहेरीच राहत असावी.

मी - नाव सांगा मुलांचं…
…..
मी - वडिलांचे नाव सांगा…

????

मी - काय झालं?

उत्तर चटकन न मिळणं…मला चुकचुकल्या सारखं झालं. 

आई - दोघांच्या पैकी कुणाचं तरी सांग की.

ती - सर, दोघांचेही नाव लिवू नका, मवं नाव लिवा….

मी - अगं पण कुणीतरी वडील म्हणून नाव लिहण्याची पद्धत आहे आपल्याकडे.

ती - ज्यानं मया जीवाचे, संसाराचे हाल केले, जो मले कधीच वागवणार नाई. अशा माणसाचं नाव नकू मले. 

सोबतचे सर - नीट विचार करून सांग पोरी. रेकॉर्ड फायनल झालं की पुन्हा सहज बदलता येणार नाही. 

तिची आई आढेवेढे घेत होती….पण तिचं नक्की झालेलं.

ती - सर…मवंच नाव लिवा...तिचं ठाम उत्तर.

मी - आधार कार्ड द्या…

सगळे एकमेकांकडे बघत राहिले.

आई, मुलगी आणि तिचा मुलगा…कुणाकडेच आधार कार्ड नव्हतं. 

आधार नसलेली निराधार माय, पोरगी, नात, आणि शिक्षणातून काहीतरी आधार हाताशी लागेल अशी अधू डोळ्यातील अंधुक आशा बाळगणारी ती दुर्दैवी आई. मला आतून हादरा देत होती. 

प्रश्न प्रश्न उत्तरं उत्तरं….!!

लेखन - संदीप विष्णू राऊत
raaut.sandip@gmail.com 

( गोपनीयता राखण्यासाठी नाव मुद्दाम टाळली आहेत. चित्र प्रतीकात्मक आहे.)

Labels: , ,